spot_img
अहमदनगरAhmednagar Unseasonal Rain News : अवकाळीचा कहर...! फळबागा उध्वस्त, रब्बी पिके भुईसपाट;...

Ahmednagar Unseasonal Rain News : अवकाळीचा कहर…! फळबागा उध्वस्त, रब्बी पिके भुईसपाट; पारनेरकर म्हणतायेत…

spot_img

Ahmednagar Unseasonal Rain News : पारनेर | नगर सह्याद्री – पारनेर [Parner News] तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे.
 
रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार उडवल्याने शेतकरी कोलमडून गेला आहे. कांदा पिकासह पपई, वटाणा, मका, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले. पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पारनेर-नगर मतदारसंघातील गावांत जून, जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकर्‍यांचे एक पिक वाया गेले होते. त्यानंतर थोडा पाऊस झाला, त्यावर काहींनी पेरणी केली होती. ते पीक हाता तोंडाशी आले असताना गारपिटीने तेही उध्वस्त झाले.

नुकसानीची पाहणी
वादळी वार्‍यासह गारपीट होऊन झालेल्या नुकसानीची आमदार नीलेश लंके [Mla nilesh Lanke], माजी आमदार विजय औटी, भाजप तालुकाध्यक्ष राहूल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी रविवारी सायंकाळी पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

निघोज, कुकडी पट्ट्यातील गावांत वार्‍यासह गारांचा पाऊस
पावसाने पिकांचे मोठे नुकसान | आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुर्णपणे हतबल
निघोज – रविवार दि.२६ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार दरम्यान झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने निघोज सहीत कुकडी पट्ट्यातील गावांत मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची रोपे व कांदा लागवडी झालेली शेती मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली. शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटाका बसला असून किमान या परिसरातील प्रत्येक शेतकर्‍यांची लाख ते सव्वा लाख रुपयांची नुकसान झाली. कांदा रोपे, कांदा लागवड, फळबागा, कडवळ, मका, उस, पपई बागा, कापसाची शेती, पेरुच्या बागा पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत.

फक्त पाउस पडला असता तर नुकसानीचे प्रमाण अत्यल्प राहिले असते. गारा पडल्याने सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले. निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गाडीलगाव, पठारवाडी, गांजीभोयरे, सांगवीसुर्या, वडगाव, शिरापुर, वडनेर देवीभोयरे या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी या वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने पुर्णपणे हतबल झाला असून सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना एकरी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी जनतेतून होत आहे. यामध्ये लिंबाच्या बागा पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. चिकू, सिताफळ, बोरं यांच्या झाडाखाली सडा पडला होता. बर्‍याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.

निघोज परिसरातील कुंड तसेच गुणोरे, गाडीलगाव, राळेगण थेरपाळ या ठिकाणी गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. वादळी वार्‍याने गोठ्यांची पत्रे उडून गेली आहेत. तसेच या गारांचा फटका जनावरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दादापाटील वराळ या शेतकर्‍यांचे पंधरा ते वीस गायांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने गायांना गारांचा तडाखा बसल्याने अक्षरशः गायांच्या अंगावर ओळ उठले होते. पन्नास कोंबड्यांचे खुराडे उध्वस्त झाल्याने यातील फक्त दहा कोंबड्या जगल्या बाकीच्या फेकून द्याव्या लागल्या. कडवळ, मका तसेच हिरवा चारा पुर्णपणे भुईसपाट झाल्याने जनावरांना खाण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिले नाही. जनवरांची ही अवस्था पाहून बहुसंख्य शेतकर्‍यांच्या चुलीही पेटल्या नाहीत.

सरपंच चित्रा वराळ पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे यांनी तातडीने कामगार तलाठी दत्तात्रय काळे व सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे यांना संपर्क करुन प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतीवर जाउन जास्तीत जास्त पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सकाळी सात वाजेपासून कामगार तलाठी दत्तात्रय काळे व सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे यांनी बहुतांश शेतकर्‍यांकडे जाउन फोटो काढून पंचनामे केले आहेत. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी रविवारी रात्री आठ वाजता राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन पारनेर तालुयातील बहुतांश गावातील नुकसानीची माहिती दिली. तसेच सरसकट पंचनामे करुण कांदा उत्पादक शेतकरी, फळबागा शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी तसेच कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

पपई बागेचे मोठे नुकसान
निघोज येथील प्रगतशील शेतकरी दत्ता जयसिंग लंके यांच्या बागेची काल झालेल्या गारपिटीने मोठे नुकसान झाले. सध्या पपई ला भाव चांगला होता. २० ते २५ रू किलो भावाने जागेवर खरेदी करुन माल शहरात वितरीत होत होता. याच बागेचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे पण कुठेतरी सुखाची चाहुल लागली आणि निसर्गानेच तोंडचा घास हिरावुन घेतला. दत्ता लंके यांच्या शेतात सध्या फ्लॉवर महिन्यात काढायला होती. तसेच आठवडे भरात कांदा रोप लागवडीस होते. या शेतकर्‍याची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. गेली पाच ते सहा वर्षात लंके यांनी शेतीची जबाबदारी सांभाळून सर्व काही स्थिरस्थावर झाले होते. लंके यांच्या शेतीची वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली असून या युवा शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पावसाने होत्याचे नव्हते
गेली चार वर्षं कांद्याला भाव नाही. केंद्र सरकारने शेतकर्‍यांची हालअपेष्टा चालवली आहे. त्यातच हे अवकाळी व गारांच्या पावसाचे अस्मानी संकट आल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुर्णपणे हतबल झाला असून कोलमडून गेला आहे. रविवारच्या वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले असून हे नुकसान कशानेच भरुण येणार नाही.
-नाना वराळ, शेतकरी

कांदा लागवड वाया
गेली पंधरा दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड केली आहे. या गारांच्या पावसाने कांद्याच्या पातीचा सुरुवातीचा भाग नष्ट झाला असून याचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच या गारांचे पाणी कांदा लागवडीच्या मुळाशी जिरल्यावर होणारे नुकसान वेगळेच आहे. शेतकरी या अवकाळी पावसाने पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.
विठ्ठलराव लंके, शेतकरी

शेती पूर्ण उद्धवस्त
रविवारी दुपारी झालेल्या गारांच्या पावसाने कुंड परिसरातील शेती पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. यामध्ये गारांच्या पावसाचा तडाखा दुभत्या जनावरांना बसल्याने अक्षरशः त्यांची अवस्था पाहुन त्यांच्या बरोबर आम्ही उपाशी राहुन त्यांच्या दुखात वाटेकरी झालो आहोत. सरकारने मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दादा वराळ, शेतकरी

नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून भरपाई द्या : डॉ. खोडदे
निघोज | नगर सह्याद्री – जवळा, गांजीभोयरे, सांगवीसुर्या, वडुले चिंचोली, पिंपरी जलसेन परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाजार समितीचे संचालक डॉ. आबासाहेब खोडदे यांनी आमदार नीलेश लंके यांकडे केली आहे. आ. लंके यांनी सोमवारी सकाळी सांगवीसुर्या, वडुले, गांजीभोयरे या ठिकाणी भेटी देत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ. खोडदे यांनी आमदार लंके यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
पारनेर तालुयातील अनेक भागात काल (२६ नोव्हेंबर) जोरदार वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने शेतीपिके उध्वस्त झाली. कांदा, केळी, द्राक्षे, फळबागा व इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेळेत पाऊस न झाल्याने पहिली पिके गेलेली होती. आता दीड ते दोन महिन्यापूर्वी झालेली कांदा लागवड अवकाळीने उध्वस्त झाली. शासनाने त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. जवळे गावचे प्रगतशील शेतकरी बबनराव बळवंतराव सालके यांच्या शेतातील तीन एकर डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरण शंकर जाधव यांच्या राहत्या घराचे नुकसान झाले. बाजार समीतीचे संचालक डॉ. आबासाहेब खोडदे यांनी जवळा गणातील गावांना आज सकाळीच भेट देण्यासाठी सुरुवात केली. कामगार तलाठी त्यांचे सहायक तलाठी, कृषी अधिकारी व कर्मचारी त्यांच्यासोबत होते.

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना राहुल शिंदेंसह सहकार्‍यांचा आधार
पारनेर तालुयातील बहुतांश गावात रविवारी (दि. २६) वादळी वार्‍यासह गारपीट व पाऊस झाला. निघोज व कुकडी पट्ट्यातील गावांत शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी सकाळी सात वाजता भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, दत्ता पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, विशाल पठारे, पप्पू रासकर, गोरख पठारे, जयदीप सालके, सुधीर रासकर, दिलीप मदगे, तान्हाजी सालके, सुधीर रासकर, कैलास शेळके आदी सहकार्‍यांनी भेट देऊन शेतकर्‍यांना आधार दिला. यावेळी मंडल अधिकारी जयसिंग मापारी, कामगार तलाठी अमोल सरकाळे, तलाठी साठे, कृषी अधिकारी गायकवाड उपस्थित होते.
भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यावेळी म्हणाले पारनेर तालुयात बहुतांश गावात मोठ्या प्रमाणात शेतीच्या नुकसानी झाल्या आहेत. याबाबत आम्ही राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करत सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

अवकाळीमुळे ५ हजार पक्षी मृत्यूमुखी
पोल्ट्री व्यवसायाला फटका | नुकसान भरपाई देण्याची मागणी
सुपा | नगर सह्याद्री – पारनेर तालुयात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पोल्ट्री व्यवसाला मोठा फकटा बसला आहे. अवकाळीमुळे ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. आधीच कंपन्याच्या मनमानी पद्धतीने व बाजार भावाच्या अनियमितपणामुळे मेटाकुटीला आलेल्या पोल्ट्री व्यायसायिक शेतकर्‍यांना गारपिटीमुळे एका नवीन संकटाचा सामना करावा लागला आहे.

पांडुरंग पवार (रा.निघोज ता.पारनेर) यांचे ९ हजार पक्ष्यांचे पोल्ट्री शेड आहे. रविवार (दि.२६) सायंकाळी ४ वाजता गारपीट झाली. या गारपिटीने ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. वार्‍याने शेडचे पडदे फाटले. वायररोप तुटून १० ते १२ लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अक्षय म्हस्के (रा.सांगवी सुर्या) व इतर पोल्ट्री व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती पारनेर तालुका अध्यक्ष सर्जेराव भोसले व सचिव राजाराम गजरे यांनी अहमदनगर पशुसंवर्धन उपायुक्त तुबांरे यांना दिली. संबंधित शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, साळवी व गोंडाबे हे नुकसान भरपाई मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. अहमदनगर जिल्हाध्यक्ष गणेश झावरे, प्रविण धरम, आशिष वामन म्हस्के यांनी शेतकर्‍यांशी संपर्क साधत सविस्तर माहिती घेतली व संघटनेच्या वतीने सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...