जनसंवाद यात्रेदरम्यान बाजारपेठेतले व्यापारी सांगत होते निम्माही व्यापार राहिला नाही. वातावरण कठीण आहे. तुम्ही काहीतरी करा.
माजी मंत्री आ. थोरात | काळेंचे शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन, व्यापारी, कष्टकर्यांकडून जनसभा यात्रेचे चौकाचौकात स्वागत
अहमदनगर | नगर सह्याद्री
जनसंवाद यात्रेदरम्यान बाजारपेठेतले व्यापारी सांगत होते निम्माही व्यापार राहिला नाही. वातावरण कठीण आहे. तुम्ही काहीतरी करा. काही लोक वातावरण खराब करतात. दहशत करतात. जाती, जातीत भेद निर्माण करतात. यामुळे व्यापार खराब होतो. आम्हाला शांत आणि बंधुत्वाचे वातावरण असणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे वातावरण शहरात करायचे आहे. त्यासाठी किरण काळेंना आमदार व्हावं लागेल, अस म्हणत विधानसभेसाठी काळे यांच्या उमेदवारीचे सुतोवाच माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी जनसंवाद सभेत केले.
कसब्याचे आ. रवींद्र धंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. शिवकालीन खेळांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी काँग्रेसने गर्दी करत शक्ती प्रदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीची आरती केली. भिंगरवाला चौकातील जैन मंदिराला भेट दिली. दर्ग्याला चादर अर्पण केली. यात्रेत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रा एमजी रोडवर येताच कार्यकर्त्यांनी काळे यांना खांद्यावर घेत घोषणाबाजी केली. चौका, चौकात व्यापारी, हात गाडीवाले, फेरीवाल्यांनी थोरात, धंगेकर, काळे यांचे सत्कार करत संवाद साधला. शहाजीराजे चौकात जेसीबीतून नेत्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्या चितळे रोडवर जनसंवाद सभा झाली. त्यापूर्वी शिवालयात जाऊन काँग्रेस नेत्यांनी स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, शहरात दहशतीचे वातावरण आहे. स्व. अनिल राठोड यांनी गुंडगिरी विरुद्ध लढा देत संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने शहराचा मोठा तोटा झाला. इथून पुढे ही लढाई कोण करणार. शहराच्या पाठीशी कोण उभे राहणार आणि त्यावेळेस किरण काळे हे नेतृत्व आम्हाला दिसले. हा गडी ना खायला मिळत म्हणून जाईल, ना दहशतीला घाबरल. तो भक्कम, हिम्मतवाला आहे. गरीबाच्या पाठीशी उभी राहण्याची त्याची ताकद, इच्छा आहे. यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. हे मोठे यश आहे. पण न दिसणारे, न बोलणारे हजारो नगरकर तयार आहेत. ते म्हणतात तुम्ही किरणला उमेदवारी द्या. आम्ही निवडून देऊ. शहराचा विकास कसा करता येईल, रोजगार कसे निर्माण करता येतील, व्यापार कसा वाढेल हे कोणीतरी पाहण्याची गरज आहे.
आ. धंगेकर म्हणाले, मराठा, धनगर, ओबीसी सगळ्यांना सरकारने आश्वासन दिली. आता हात वर केले. जनतेला दिशाहीन करण्याचे काम मोदी यांनी केले. समाजाला चांगलं, वाईट कळत असते. किरण काळे यांनी जे पेरल ते भविष्यात नक्की उगवेल. कसब्यातील ऐतिहासिक विजयाबद्दल शहर जिल्हा काँग्रेसतर्फे किरण काळे यांच्या हस्ते धंगेकरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
किरण काळे म्हणाले, शहरातल्या हत्याकांडांवर मी निर्भीड भूमिका घेतली म्हणून मला पोलिसांमार्फत नोटिसा बजावल्या. चौकशीसाठी बोलवले. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही. मी खकीचा आदर करतो. पण बनावट आयटी पार्कचा भांडाफोड केला म्हणून माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. सखोल तपास झाला. फिर्यादच खोटी होती. गुन्हा घडलाच नाही, असा पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट सादर केला. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. जनसंवाद यात्रा व सभेच्या निमित्ताने काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहरात मोर्चे बांधणी केल्याचे मानले जाते. यावेळी मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे, विलास उबाळे यांची भाषणे झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त हवेत तिरंगी फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
COMMENTS