मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगें सलाईनवर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला जालना / नगर सह्याद्री - मराठा आररक्षणाच्या...
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगें सलाईनवर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
जालना / नगर सह्याद्री -
मराठा आररक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. कालही ते झोपूनच होते आणि आज त्यांना सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. २९ ऑगस्टपासून ते उपोषण करत आहेत. त्यांना आता अशक्तपणा जाणवत असूनही बोलण्यासही त्रास होतो आहे.
मनोज जरांगे पाटील मंगळवारी काय म्हणाले होते?
आता शेवटचं लढतोय, यावेळी आरक्षण नाही मिळालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल.” जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, मी सगळ्यांना सांगितलंय, “बाळांनो मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा. त्यामुळे मी असा मेलेला बरा. मी ४ फेब्रुवारीपासून लढतोय.”
मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली. परंतु आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे सांगून जरांगे पाटील यांनी त्यांना आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील, असं मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारीच स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढत नाही तोवर उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे. त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यभरातील विरोधी पक्षांनी आणि जनतेने सरकाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे राज्य सरकार अखेर या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहू लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी आता राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
राज्य सरकारकडून आता मनोज जरांगे पाटलांची मनधरणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने आज (५ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात (उपोषणाचं ठिकाण) जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. यावेळी महाजन यांच्याबरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकरही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांनी जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
COMMENTS