जालना / नगर सह्याद्री - जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. हे आंदोलक ग...
जालना / नगर सह्याद्री -
जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. हे आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन बस पेटवल्या आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही वेळापूर्वी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाल्याचे सांगितले जात आहे. जिथे पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला तिथून चार किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी दोन बस पेटवल्या आहेत. तसेच काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. एक खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस आंदोलकांनी पेटवली आहे.
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांची परिस्थिती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण मागे घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमके काय घडले?
बेमुदत उपोषण स्थळी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिसांचा मोठा राडा झाला. या दरम्यान बाचाबाची होऊन या ठिकाणी दगडफेक, लाठी चार्ज झाला. गावातील आनेक नागरिक जखमी झाले, पोलिस देखील जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी तालुका 1 रोजी गालबोट लागले. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली यात तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलिस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.
3 जिल्ह्यांतील गावांमध्ये बंद
मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाला सुरूृुवात केली आहे. मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू असून मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील आणि शेजारीत तीन जिल्ह्यांतील अनेक गावांनी कडकडीत बंद पाळला आहे.
ग्रामसभेत ठराव
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीसह जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी बंद पुकारला. वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तिर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, कोळगाव, मांजरसुंबा, गोंदी, धोंडराई या गावातील व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी बंद पुकारत उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांचाही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वडीगोद्री ग्रामपंचायतीने गुरुवारी ग्रामसभेत ठराव घेऊन कडकडीत बंद पाळला.
गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह
जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावे असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटे आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.
मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीमार दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. जनतेला शांततेचे आवाहनही शिंदेंनी केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, 'जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.'
भाजपने मराठा समाजाची माफी मागावी - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.'
सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आलीय - रोहित पवार
रोहित पवार यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळण्यासाठी अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध. राज्य सरकारला सत्तेची मस्ती चढली असून सत्तेच्या मस्तीतूनच सरकार असा लाठीचार्ज करत आहे. आता या मस्तवाल आणि घमेंडिया सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जालन्यातील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांशी स्वत:हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीरतेनं काम करत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे एकादिवसात सुटणारा प्रश्न नाही. तो सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले असल्याचं उपोषणकर्त्यांना सांगितलं होतं.”
घटना दुर्दैवी - उपमुख्यमंत्री फडणवीस
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जालन्यातील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांशी स्वत:हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीरतेनं काम करत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे एकादिवसात सुटणारा प्रश्न नाही. तो सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले असल्याचं उपोषणकर्त्यांना सांगितलं होतं.”
“अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी”
“मात्र, आंदोलक उपोषण सोडवण्यासाठी तयार नसल्याने त्यांची तब्येत खालावत होती. कोणत्याही उपोषकर्त्याची तब्येत खालावत असेल, तर रूग्णालयात दाखल करण्यात यावं, ही सरकारची जबाबदारी आहे. उपोषकर्त्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी गुरूवारी प्रयत्न करण्यात आले. पण, उपोषकर्त्यांना उद्या या सांगितलं. त्यानुसार आज पोलीस गेल्यानंतर त्यांना घेरून दगडफेक करण्यात आली. यात अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर लाठीचार्ज झाला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
शेवगाव- पाथर्डी रोडवर आंदोलन
जालना येथे मराठा क्रांती मोर्चा वर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास पाथर्डी शेवगाव रोडवर साकेगाव फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावरती टायर जाळून निषेध नोंदवला. जालना येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा जालना येथे मराठा आरक्षण मोर्चावर पोलिसांकडून हल्ला व अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे सध्या पाथर्डी शहरात शांतता असून पोलीस सर्व घटनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळालेली आहे.
COMMENTS