योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
राज्यात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असला तरी पहिल्या अंकावरचा निर्णय अजूनही जाहीर झाला नाही. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पद घालवत भाजपसोबत युती करून स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्रतेची कारवाईवरील सुनावणीला अजूनही सुरुवात झाली नाही. अशातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूक लागणार असून निकाल कधी लागणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. या गोष्टीला अनेक महिने होऊन गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच असे सांगत आहेत, परंतू त्याला मुहूर्त काही मिळत नाहीय. सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे ते सांगत होते, परंतू, दोन महिने होत आले तरी त्यांच्या काही हालचाली दिसत नसल्याचे पाहून ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात हजर झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांकडून नार्वेकरांनी उत्तर मागविले होते.
शिंदे गटाने यावर वेळ मागितला होता. तो वेळ देखील नार्वेकरांनी दिली होती. आता शिंदे गटाने यावर सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. परंतु योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.
COMMENTS