मुलाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी उडी मारली व ते दोघेही पाण्यामध्ये बुडाले.
मुंबई । नगर सह्याद्री
वसई किल्ला येथील समुद्रकिनारी रविवारी संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यानंतर सेल्फी काढताना १४ वर्षीय मुलगा पाण्यात पडला. मुलाला वाचविण्यासाठी वडील गेल्यावर त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाप-लेकाचा शोध सुरु केला.
शैलेंद्र मोरे (४२), मुलगा देवेंद्र मोरे (१४) हे वसईच्या ओम नगर मधील स्थायिक होते. रविवारी त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा पाठ आयोजित केला होता. पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे मुलाला घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळ गेेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्र जेटीवरून सेल्फी काढत असताना मुलाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी उडी मारली व ते दोघेही पाण्यामध्ये बुडाले.
तिथे असलेल्या एका नागरिकाने हा प्रकार वसई पोलिसांना कळविला. तिथे असलेल्या दुचाकीवरून सोमवारी दुपारी पोलिसांनी शैलेंद्र मोरे यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. वसई पोलिसांचे पथक समुद्रात बेपत्ता बाप-लेकाचा शोध घेत आहे. पथक बोटीने सर्व समुद्रकिनार्यावर शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितली.
COMMENTS