जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद संगमनेर | नगर सह्याद्री संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी...
जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद
संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळाल्याचे गौरवउद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले. व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देत असल्याचे प्रतिपादन आ. सत्यजित तांबे यांनी केले.
मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व ‘दे असरा’ संस्थेतर्फे व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ.आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे उपस्थित होते. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, निकोप व निरोगी समाज निर्मितीसाठी जय हिंद लोक चळवळ काम करते. मागील पंचवीस वर्षात सातत्याने विविध उपक्रम राबवले. बेरोजगारी देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी युवकांना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व्हावे यासाठी असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
महिन्याच्या दुसर्या मंगळवारी शिबिर
युवक व युवतींचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने दर महिन्याच्या दुसर्या मंगळवारी संगमनेर मध्ये उद्योजकता व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर होणार असून यामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे
आमदार तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून युवकांपुढे आदर्श उभा केला. रयतेचे स्वतःचे राज्य त्यांनी निर्माण केले. व्यवसायातून प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून कारखाना, दूध संघ, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तालुक्याची आर्थिक प्रगती साधली. यामुळे विविध क्षेत्रात ८० हजार लोकांना रोजगार मिळाले. शेती व्यवसायात नवीन कल्पना रुजवल्यास यश मिळेल.
डॉ. आनंद गोडसे म्हणाले, नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत असल्याने युवकांनी उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे. या क्षेत्रात मोठी संधी आहे. मार्केटची स्थिती, आपली क्षमता ओळखून व्यवसाय निवडावा. डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, संगमनेर शिक्षण व आरोग्याचे मोठे हब असून मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे वार्षिक सुमारे ५००० कोटींची उलाढाल तालुक्यातून होते. तरुणांना व्यवसायासाठी मोठी संधी आहे. स्वागत कमलेश उनवणे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ व नामदेव कहांडळ यांनी केले. डॉ. अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले.
COMMENTS