शिवसेनेचा आरोप; ३० तारखेला मोर्चा अहमदनगर | नगर सह्याद्री गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर, जमिनीवर ताबा मारण्याचा ...
शिवसेनेचा आरोप; ३० तारखेला मोर्चा
अहमदनगर | नगर सह्याद्री
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर, जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रकार सहन करणार नाही. असे प्रकार घडल्यास नागरिकांनी उघडपणे सांगावेत असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. या सर्व घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी करत दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अशोक दहिफळे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, अंबादास शिंदे आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले की, नगर शहरामध्ये मागील ४० वर्षांमध्ये अशा प्रकारची गुंडगिरी झालेली नव्हती. पण, आता अलीकडच्या सात ते आठ वर्षांमध्ये ताबा मारण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसू लागलेला आहे. जे व्यक्ती बाहेरगावी राहत आहेत, अशांची यादी गोळा करून हे त्या गुंडांना देत आहेत. त्यातूनच हे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनिल राठोड हे आमदार असताना असे कधी घडलेले नव्हते. मात्र, आता हे प्रकार सर्रासपणे घडले आहेत. खासदार सुजय विखे यांना लोकांनी निवडून दिले ते आता काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनांना लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असा आरोप केला.
अभिषेक कळमकर यांनी घडलेली घटना अतिशय भयंकर असून जागा बळकावण्याचे प्रकार चालल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी राठोड हे नगर शहराचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी संरक्षणाचा विषय घेतला होता. तेव्हा असे प्रकार कधीच घडले नाही.
आता जागा बळकावणार्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यांचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे. यावेळी पीडित झालेले कुटुंबातील कलवार यांनी सांगितले की, नगर-कल्याण रोडवर १६ गुंठे जागा वडिल रामेश्वर यांच्या नावावर होती. वडील मयत होऊन पाच वर्षे झालेले होते. आम्ही या ठिकाणी आलेलो नव्हतो. त्यामुळे या जागेबाबत आम्हाला काही माहीत नव्हते. मात्र, ज्या वेळेला आम्ही आमची कागदपत्रे तपासायला गेलो. त्यावेळी ही जागा परस्परित्या गुंडांनी घेतली असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. आमची जागा मोहोळ नामक व्यक्तीला विकण्याचा प्रकार झाला.
आम्ही या संदर्भामध्ये न्यायालयात गेलो असून न्यायालयाने या जागेवर कोणतेच व्यवहार करू नये, अशा प्रकारची स्टे ऑर्डर दिली आहे. गुंडांकडून आमच्या कुटुंबाला धमकवण्याचा प्रकार झाला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शारदा लोंढे यांनी प्रोफेसर कॉलनीमध्ये आमची पाच एकर जागा असून या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे गुंड आणून जागा खाली करून घेण्याचा प्रयत्न यावेळी झाला. जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला. दहा वर्षापासून असा त्रास सहन करावा लागत आहे असे ते म्हणाले.
COMMENTS