मागील वर्षाच्या तुलनेत ४ टक्के घट ः कोकण आघाडीवर पुणे | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या ...
मागील वर्षाच्या तुलनेत ४ टक्के घट ः कोकण आघाडीवर
पुणे | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे.
यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.
११ गुन्हे दाखल झालेपेपरफुटी व इतर तत्सम प्रकरणात परीक्षा काळात ११ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात डमी विद्यार्थी- १, कॉपी करणारे विद्यार्थी- ३४५, एकूण गैरप्रकार- १ हजारहून अधिक. या परीक्षेत १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१.२५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. गोसावी म्हणाले, परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडली होती.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळ मिळण्यासाठी वेळापत्रकात एका दिवसाचा खंड ठेवला होता. ३८३ समुपदेशकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले. कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यात २७१ भरारी पथके कार्यरत होती.
गेल्या पाच वर्षांचा निकाल
२०१८ - ८८.४१ टक्के, २०१९ - ८५.८८ टक्के, २०२० - ९०.६६ टक्के, २०२१ - ९९.६३ टक्के, २०२२ - ९४.२२ टक्के
शाखानिहाय निकाल
कला - ८४.०५ टक्के, विज्ञान - ९६.९ टक्के, वाणिज्य - ९०.४२ टक्के,
व्यवसाय अभ्यासक्रम - ९१.२५ टक्के
विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : ९३.३४ टक्के, नागपूर - ९०.३५ टक्के, औरंगाबाद - ९१.८५ टक्के, मुंबई - ८८.१३ टक्के, कोल्हापूर - ९३.२८ टक्के, अमरावती - ९२.७५ टक्के, नाशिक - ९१.६६ टक्के, लातूर - ९०.३७ टक्के,कोकण - ९६.१ टक्के
COMMENTS