अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी कारखाना प्रशासनाकडून श्री नागवडेंना तोफांची सलामी आप्पा चव्हाण / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्यातील ...
अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी कारखाना प्रशासनाकडून श्री नागवडेंना तोफांची सलामी
आप्पा चव्हाण / नगर सह्याद्री -
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असताना जनतेने नागवडे कुटुंबावर गेली ६०-६५ वर्ष अपार प्रेम केले, यापुढेही असेच पाठबळ द्यावे, निश्चितपणे तालुका वैभवशाली करू ,अशी ग्वाही सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी दिली.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व रक्तदान शिबिर नागवडे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या वतीने श्री नागवडे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी साखर कारखान्याचे २८ सेवानिवृत्त कामगारांचा देखील सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंनी श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठे योगदान दिले. खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला. आणि तिथूनच पुढे खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाला गती आली. या दुष्काळी तालुक्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सहकार महर्षी बापूंनी अहोरात्र कष्ट घेतले. सहकार चळवळ उभी केल्यानंतर घोड व कुकडीचे पाणी तालुक्यात मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला. श्रीगोंदा तालुका हा ७० टक्के सिंचन क्षेत्रात मोडतो बापूंनी सहकार, शिक्षण व सिंचन क्षेत्रात नेत्र दीपक काम केले. त्यामुळे बापूंची तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांना क्षणोक्षणी आठवण आल्याशिवाय राहत नाही. बापूंनी राज्यात सहकार क्षेत्रात आदर्शवत असे काम केले सहकार चळवळ चालवत असताना बापूंचे कोजनचे स्वप्न होते. ते संचालक मंडळाने पूर्ण केले. आता डिस्टिलरी विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू करून पुढील वर्षी पूर्णत्वास नेणार आहोत. सहकारी साखर कारखानदारीला शासनाचे निर्बंध आहेत. त्यानुसार सहकाराचा गाडा चालवावा लागतो. एफ आर पी नुसार मागील ऊस उत्पादकांची सर्व देणे अदा केली. कामगारांची ही थकीत देणे लवकर अदा केली जातील. साखर कारखानदारी चालवताना सहकार महर्षी बापूंचे कार्यकर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून साखर कारखानदारी टिकविण्यासाठी काटकसरीने कारभार करून, कारखान्याचा नावलौकिक वाढवण्याचा आपला मानस आहे. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की कोरोना कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतला दहा हजार तर नगरपालिकेला५० हजार रुपये आर्थिक मदत देऊन छत्रपती शिवाजी कॉलेजवर कोविड सेंटर उभे करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. आपण वाढदिवसाचा अनाठाई खर्च करण्यापेक्षा कारखाना कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरही पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवून सिंचनाची सोय केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम केले. दुष्काळामध्ये जनावरांना चारा, पिण्याचे पाण्याच्या टाक्या देण्याचे काम हाती घेतले. बापूंनी तालुक्यात उभ्या केलेल्या शिक्षण संस्थांमार्फत आज जवळपास चारशे लोकांना रोजगार मिळतो तेथेही पाठबळ देण्याचे काम करत आहोत. सहकारात बापूंनी घालून दिलेले संस्कार त्यानुसार आपण सर्व क्षेत्रात प्रमाणिकपणे योगदान देत आहोत. यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा श्री नागवडे यांनी यावेळी व्यक्त उपस्थित सर्वांचे आभार मानले.
प्रास्ताविकात कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यावेळी म्हणाले की ,ज्या उभारीने सहकार महर्षी बापूंनी तालुक्यात काम केले. त्या पद्धतीने राजेंद्र दादांनी सहकिार क्षेत्र व तालुक्यात दिशादर्शक काम करून सहकार महर्षी बापूंचा वसा आणि वारसा जोपासण्याचे काम केले आहे. समाजाला जे अभिप्रेत आहे. तेच काम दादा करत आहेत. कारखान्याचे विस्तारीकरण ११० कोटीचा प्रकल्प हा नव्वद कोटीमध्ये केला. त्याचे कर्जहीेे फेडले गेले आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की सहकारी साखर कारखानदारी चालविणे सोपे नाही, सहकाराला अनेक निर्बंध आहेत. शासनाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतात. बापूंनी ज्या पद्धतीने साखर कारखान्याचा कारभार पाहिला. त्याच पद्धतीने दादांनी काटकसरीने कारभार करून सभासदांनी देखील नागवडे कुटुंबावर दृढ विश्वास कायम ठेवला. साखर कामगार, शिक्षण संस्थांतील सर्वच कर्मचाऱ्यांनी दादांना भरभरून साथ दिली. असे सांगून श्री शिंदे यानी नागवडेंना अभिष्टचिंतनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धर्मनाथ काकडे, अॅड. अशोकराव रोडे, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष आनंदराव वायकर, भाऊसाहेब खेतमाळी, लक्ष्मणराव नलगे, आदींनी राजेंद्र नागवडे यांच्या सामाजिक राजकीय कार्यकर्तुत्वावर प्रकाश ज्योत टाकत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या
अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की, राजेंद्र दादा नागवडे हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर कर्नाटक राज्यात देखील काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. देशात देखील काँग्रेसला उज्वल भविष्य आहे. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार आहे. देशात काँग्रेस पक्षाने सार्वभौमता, समता, एकता जोपासली. काँग्रेसने सत्तेवर असताना कधीही ईडी सारख्या संस्थेचा वापर केला नाही. भाजप सरकारच्या काळात मात्र हे सत्र सुरू केले आहे राजेंद्र नागवडे हे धडाडीचे निर्णय क्षमता असलेले युवक नेते असून, आगामी विधानसभेत नागवडे कुटुंबांचा आमदार करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, आपण यापुढे राजकारणातून निवृत्ती घेणार आहोत. सहकार महर्षी बापूंनी तालुक्यात विकासाचा मोठा डोंगर उभा केला आहे. नागवडे कुटुंबाने संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यच्या हितासाठी खर्ची घातल्याचे सांगून, श्री राजेंद्र नागवडे यांना श्री भोस यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास साखर कामगार युनियनचे अध्यक्ष आनंदराव वायकर, ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते, प्रेमराज भोईटे, धनसिंग पाटील भोईटे, काष्टी सोसायटीचे उपाध्यक्ष शहाजी भोसले, बबनराव पिंपळे, दिलीप चौधरी, बेलवंडी सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकर शेलार, एम डी शिंदे, नगरसेवक गणेश भोस, निसार बेपारी, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी छत्रपती व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, बी. के. लगड, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे निरीक्षक श्री सुरेश गोलांडे, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी, प्राचार्य अमोल नागवडे, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे सर्व सेवकवृंद, सभासद, कामगार आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी केले. आभार संचालक प्रा सुरेश रसाळ यांनी मानले.
COMMENTS