महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होण्याच्या दिशेने | काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार मुंबई | नगर सह्याद्री - राज्यभर जाहीर सभा घेऊन भाजपविरोधात वा...
महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होण्याच्या दिशेने | काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार
मुंबई | नगर सह्याद्री -
राज्यभर जाहीर सभा घेऊन भाजपविरोधात वातावरण निर्मितीचे प्रयत्न करणार्या महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत. यापूर्वी शरद पवार, अजित पवार यांनी काँग्रेस, उद्धव सेनेच्या भाजपविरोधी भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करून संशयाचे वातावरण निर्माण केले होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यात वाक्युद्ध सुरू झाल्याने आघाडीची वज्रमूठ आवळण्यापूर्वीच सैल होत आहे. हे संशयाचे धुके दूर करण्यासाठी मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी चर्चा केली, तर आता काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी. वेणुगोपाल मुंबईत येऊन चर्चा करणार आहेत.
गोंदिया बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याने पटोले-पवार वाद पेटला. जो भाजप शेतकरी विरोधी धोरण आखतो त्याच्याशी आम्ही एकाच विचाराने लढत असताना राष्ट्रवादीला युती करण्याची गरजच काय? तसे केले तर राष्ट्रवादीही शेतकरीविरोधी होईल, असे पटोले म्हणाले. याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अंतर निर्माण होऊ शकते.
त्यांनी आपले म्हणणे मीडियाकडे मांडण्याऐवजी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडायला हवे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा बातम्या आल्या की आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. महाविकास आघाडीची सभा होईल त्या वेळी या गोष्टी मी मांडणार आहे.
पवारांच्या या टीकेला पटोलेंनी लगेच प्रत्त्युत्तर दिले. कदाचित अजित पवार यांना माहिती नसेल, पण मी जयंत पाटलांशी याबाबत आधीच चर्चा केली आहे. भाजपला मदत होईल अशी त्यांची भूमिका आम्हाला कदापि चालणार नाही. दरम्यान, नंतर एक प्रसिद्धिपत्रक काढून महाविकास आघाडीत कुठलेही वाद नसल्याची सारवासारव पटोलेंनी केली. राष्ट्रवादी विरोधातही आक्रमक झालेली काँग्रेस आता इलेशन मोडवर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात १७ जणांची समिती नेमली. यात बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, अतुल लोंढे, संध्या सव्वालाखे, देवानंद पवार, प्रमोद मोरे व अमरजित मनहास यांचा समावेश आहे.
COMMENTS