घरगुती दरात सहा टक्क्यांची वाढ: महावितरणसह खासगी कंपन्यांची वीज महागली मुंबई | वृत्तसंस्था वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय शनिवारप...
घरगुती दरात सहा टक्क्यांची वाढ: महावितरणसह खासगी कंपन्यांची वीज महागली
मुंबई | वृत्तसंस्था
वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय शनिवारपासून लागू केला असून, त्यामुळे घरगुती दरात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आधीच महागाईच्या आगीत होरपळणार्या सामान्यांना हा मोठा झटका आहे. महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने ही दरवाढ केली आहे. त्यासाठी आर्थिक तोट्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने २०२३-२४ मध्ये सरासरी २.९ टक्के, २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ केली आहे.
घरगुती विजेच्या दरात २०२३-२४ साठी सहा टक्के, २०२४-२५ साठी सहा टक्के वाढ असेल. बेस्टच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी सुमारे ५.०७ टक्के वाढ झाली आहे. २०२४-२५ साठी ६.३५ टक्क्यांची दरवाढ असेल.अदानी इलेट्रिसिटीच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी सरासरी २.२ टक्के दरवाढ झाली आहे. त्यात २०२३-२४ साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी २०२३-२४ साठी ११.९ टक्के वाढ झाली आहे. २०२४-२५ साठी १२.२ टक्के वाढ झाल्याचे समजते.
महावितरणने प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की महावितरणची आर्थिक वर्ष २०१९-२०२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ करिता अचूक समायोजन, २०२२-२३ करिता तात्पुरते अचूक समायोजन, तसेच २०२३-२४ आणि २०२४-२५ या नियंत्रण कालावधीकरिता अंदाजित एकूण महसुली गरज आणि वीज दरास मंजुरीसाठीची वीज दर याचिका २४ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दाखल करून घेतली. आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या. २१ फेब्रुवारी २०२३ ते ०३ मार्च २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च २०२३ च्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील.
राज्यात वीज गळती व वीज चोरीवर नियंत्रण नाही. मराठवाड्यातील काही फिडरवर ८० ते ९९ टक्क्यांपुढे वीज गळती असल्याने वीज हानी वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी नुकसानभरपाईसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करून ग्राहकांकडून तो वसूल केला जात असल्याचा आरोप वीज क्षेत्रातील अभ्यासक अजित देशपांडे यांनी केला आहे. आंध्र प्रदेशमध्ये आधिभारासह कमीत कमी १.९ आणि जास्तीत जास्त ९.७५ रुपये, गुजरात ३.५ ते ५.२, दिल्ली ३ ते ८ रुपये, गोवा १.६ ते ४.५ रुपये वीज दर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात ५.३६ ते १५.५६ रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळते. इतर राज्यांच्या तुलनेत तीन पट वीज बिल जास्त आहे. तरीही नव्याने वीज दरवाढ केली असल्याचे देशपांडे म्हणाले.
COMMENTS