अहमदनगर | नगर सह्याद्री - जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नियुक्ती कर...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने एलसीबीला एक तत्पर अधिकारी मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबीची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबीच्या निरीक्षकपदी केली आहे.
दरम्यान बदली होऊनही कार्यरत असलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांना अजूनही याच ठिकाणी ठेवले जाईल, अशी चर्चा रंगली होती, मात्र अधीक्षक ओला यांनी निरीक्षक कटके यांच्या जागी निरीक्षक आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबीला दबंग अधिकारी मिळाला आहे.
आहेर बीड एलसीबीच्या निरीक्षकपदी असताना त्यांनी नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दीपक कोलते यांच्या खून प्रकरणातील आरोपी पिन्या कापसे याला पाठलाग करून पकडले होते. पिन्या कापसेने त्यावेळी निरीक्षक आहेर यांच्या पथकावर गोळीबार केला होता. त्यांच्या कामगिरीची दखल अधीक्षक ओला यांनी घेतली आहे.निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. निरीक्षक आहेर जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला बेलवंडी व नंतर सायबर पोलीस ठाण्याचा कारभार यशस्वी संभाळला आहे. याचबरोबर पो. उपनिरीक्षक युवराज अहिरे यांची संगमनेर पोलीस ठाण्यात वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप यांना कोपरगाव पोलीस ठाण्यात पाठविले आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांना नियंत्रण कक्षात पाठविले आहे. पो. नि. चंद्रकांत निरावडे यांना कर्जत पोलीस ठाणे देण्यात आले आहे.
‘त्या’ कर्मचार्यांच्या बदल्या होणार का?
गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून काही पोलिस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ठाण मांडून आहेत. वरिष्ठांच्या आशिर्वादामुळे अद्याप त्यांची बदली झालेली नाही. सध्या पोलिस कर्मचार्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले असून जिल्हातील पोलिसांकडून एलसीबीलाच प्रथम प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पंधरा वर्षापासून ठाण मांडून असलेल्या त्या पोलिस कर्मचार्यांची बदली होणार का? दुसर्यांना संधी केव्हा मिळणार? असा सवाल पोलिसांमधून उपस्थित केला जात आहे.
COMMENTS