निघोज | नगर सह्याद्री पाउस वेळी अवेळी पडणार आहे. मात्र शेतकर्यांनी घाबरून जाउ नये. शेतकर्यांना अवेळी येणार्या हवामानाच्या संकटापासुन सावध...
निघोज | नगर सह्याद्री
पाउस वेळी अवेळी पडणार आहे. मात्र शेतकर्यांनी घाबरून जाउ नये. शेतकर्यांना अवेळी येणार्या हवामानाच्या संकटापासुन सावध करण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली.
निघोज येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निघोज ग्रामस्थ, शेतकरी बांधव तसेच विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच माऊली वरखडे, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, ज्ञानेश्वर लंके, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, उज्वला ग्रोचे अध्यक्ष सचिन वरखडे, सागर पठारे, प्रगतीशील शेतकरी अर्जुन शिंदे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी विश्वस्त बबनराव तनपुरे आदींनी हवामान तज्ञ पंजाबराव ढख यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी निघोज ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने उपसरपंच माउली वरखडे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, आपली माती आपली माणसं या संस्थेच्या वतीने अध्यक्ष रुपेश ढवण, पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने भास्करराव कवाद, व्यापारी असोसिएशनच्या वतीने संदीप वरखडे यांनी ढख यांचा सत्कार केला.
ढख यावेळी म्हणाले वनराईचा उपयोग पाउस पडण्यासाठी होतो म्हणून आपण झाडे जगवा झाडे वाढवा या नुसार वनराई वाढवीत होतो. आज मात्र उद्योग विश्व मोठ्या प्रमाणात आहे. काँक्रिट रस्ते, डांबरी रस्ते, सिमेंटच्या मोठ मोठ्या ईमारती यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी झाडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असून जोराचा पाऊस पडण्याऐवजी कमी तिव्रतेने पाउस पडत आहे. दोन्ही दृष्टींनी झाडे महत्वाची आहेत. १९५२ पासून प्रत्येक दहा वर्षे पुर्ण झाल्यावर दुष्काळ पडला होता. १९१२ आणी १९२२ ला दुष्काळ पडला नाही.गेल्या तीस वर्षांपासून आपण पाउस, पाणी याचा अंदाज वर्तवीत असून यासाठी दररोज असंख्य शेतकरी आपणाला भेटत असतात.
या अंदाजाच्या माध्यमातून हजारो शेतकर्यांच्या नुकसानी टाळण्याचा प्रयत्न आपण केला आहे. यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण लाखो शेतकर्यांपर्यंत पोहचलो असून आपण केलेला पावसाचा अंदाज आजपर्यंत खरा ठरला असून यामाध्यमातून आपण लाखो शेतकर्यांना सावध करुन शेतीच्या नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला हे सर्वाधीक समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राज्यातून शेतकरी आपल्याला संपर्क साधीत असून शेती हे सर्वोत्तम प्रगतीचे माध्यम असून युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रगतीशील शेती करीत देशाचा विकास साधण्याचे आवाहन डख यांनी केले आहे.
COMMENTS