मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता या अवकाळी पावसाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. आज म्हणजे...
मुंबई / नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता या अवकाळी पावसाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईच्या भल्यापहाटे कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. मुलुंड, विक्रोळी, अंधेरीत पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई उपनगर आणि आजुबाजूच्या परिसरात सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे.
राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस मुंबईतही धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला आहे. मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हा अवकाळी पाऊस मुंबईत बरसत आहे. मुंबईकरांची आजची सकाळ पावसाने सुरू झाली असून अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
COMMENTS