काळाराम मंदिरातील मंहंतांविरोधात व्यक्त केला संताप नाशिक | नगर सह्याद्री काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रप...
काळाराम मंदिरातील मंहंतांविरोधात व्यक्त केला संताप
नाशिक | नगर सह्याद्री
काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे यांचा संताप अनावर झाला.
संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत संताप व्यक्त केला. रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पुजा करताना महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशाप्रकारे पोस्ट करत संयोगिताराजे यांनी महंतांना खडसावले आहे.आपण सर्वजण देवाची लेकरे.
लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.
अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हटली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.
COMMENTS