आमदार संग्राम जगताप | शहराला ३९ कोटींचा निधी मंजूर अहमदनगर | नगर सह्याद्री- महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेल्या नगर शहरातील वि...
आमदार संग्राम जगताप | शहराला ३९ कोटींचा निधी मंजूर
अहमदनगर | नगर सह्याद्री-
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेल्या नगर शहरातील विविध विकासकामांना सध्याच्या विद्यमान सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन स्थगिती उठविली नाही तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये स्थगिती उठविण्यासाठी याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
शहरातील मंजूर असलेल्या विकासकामची स्थगिती उठविण्यासाठी शासनदरबारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासकीय पातळीवर वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. परंतु आजतागायत राज्य शासनाने स्थगिती उठविली नाही. अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील राज्य शासनाने अर्थसंकल्प २०२२-२३ मधून राष्ट्रीय महामार्ग २२२ ते अहमदनगर पुणे रोड काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ कोटी, खारेकर्जुने हिंगणगाव, निमगाव वाघा, केडगाव, बुरूडगाव, वाकोडी - वाळुंज ते राज्य मार्ग ५८ ला मिळणार्या रस्त्याचे काँक्रीटीकरणासाठी रुपये ७ कोटी ६० लक्ष असा एकूण २२.६० कोटी रूपये निधी मंजूर केला होता.
परंतू या मंजूर असलेल्या निधीच्या वापरास विद्यमान सरकारने स्थगिती दिली. महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुलभूत सोईसुविधांचा विकास करण्यासाठी १० कोटींच्या विकासकामांना मंजूरी दिली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने बुरूडगाव रोड येथील चाणय चौक ते डॅाटर कॉलनी, टीसीआय गोडाऊन पर्यंत रस्ता विकसीत करण्यासाठी ३.५० कोटी, शांतीनगर ते भगवान बाबा नगर ते शिवगंगा टॉवर ते सचिन नगर ते बिडवाई घरपर्यंत रस्ता विकसित करण्यासाठी ३.०० कोटी, सारसनगर मधील धनश्री बंगला ते सारस कॉलनी ते शिवगंगा टॉवर्स ते ससाणे घरापर्यंत रस्ता विकसित करणे, परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी २.०० कोटी रुपये व सारसनगर मधील वर्धमान रेसिडेन्सी ते जय बजरंग व्यायाम शाळा ते कपिलेश्वर कॉलनी ते भगवानबाबा मंदिरापर्यंत रस्ता विकसित करण्यास १.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.
शहरातील पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांचे निवासस्थान व नवीन कार्यालयीन इमारत बांधण्याचे काम मंजुरी करिता प्रलंबित आहे. तारकपूर बसस्थानकाच्या विकासासाठी रूपये ७ कोटी व माळीवाडा बसस्थानकाच्या विकासासाठी रूपये १६ कोटी निधीचा प्रस्ताव मंजुरीविना प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने या विकासकामास अद्यापपर्यंत निधी वर्ग केलेला नाही. पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे हायवे ते फुलसौंदर मळ्यापर्यंत सीना नदी सुशोभिकरणासाठी रुपये ०३ कोटी, कल्याण रोड ठाणगे मळा ते अमरधाम पर्यंत सीना नदी सुशोभिकरणासाठी ०३ कोटी अशी एकूण रुपये ६ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली परंतू या रकमेच्या वापरास सुध्दा विद्यमान सरकारव्दारे स्थगिती देण्यात आली. शहरामध्ये सुमारे ३९ कोटी रुपयांची मंजूर विकासकामे होणे अत्यंत गरजेचे आहे. या विकासकामांमुळे शहराच्या विकासाला गती प्राप्त होईल व काहीप्रमाणामध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील. आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. संग्राम जगताप यांनी प्रत्येक कामाबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केले.
COMMENTS