बाजार समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध | तालुक्याचे राजकारण तापणार अहमदनगर | नगर सह्याद्री- गेल्या वर्षभरापासून लांबणीवर पडलेल्य...
बाजार समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध | तालुक्याचे राजकारण तापणार
अहमदनगर | नगर सह्याद्री-
गेल्या वर्षभरापासून लांबणीवर पडलेल्या बाजार समित्या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केल्याने आता जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्याने बाजार समिती निवडणुकीत सर्वच पक्ष नशीब अजमावणार असल्याने बाजार समित्यांची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान अंतिम मतदार यादीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
१८ जागांसाठी ३९२१ मतदार
कै. स्व. माजी खासदार दादापाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १८ जागांसाठी एकूण ३९२१ मतदार आहेत. यात ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी १०११, सोसायटी मतदारसंघासाठी १३९४, हमाल मापाडी मतदारसंघासाठी १२४३ तर व्यापारी मतदारसंघासाठी २७३ मतदार आहेत.
जिल्ह्यातील नगर, पारनेरसह, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा बाजार समितींवर संचालक मंडळांची मुदत संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकांस दुसर्यांदा मुदत वाढ मिळाली आहे. तर काही बाजार समित्यांवर गेल्या वर्षभरापासून प्रशासक आहे. यापूर्वी बाजार समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
कर्डिले गटाचा प्रचाराचा नारळ फुटला
स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीवर गेल्या वर्षभरापासून प्रशासक आहे. सोमवारी अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. ३० एप्रिल पूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत. हे लक्षात घेऊन बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाने रुईछत्तीशी येथील कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या े प्रचाराचा नारळ फोडला. बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा कर्डिले विरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडीचा संघर्ष पहावयास मिळणार आहे.
परंतु, दरम्यानच्या काळात झालेल्या ग्रामपंचायत व सोसायटीच्या सदस्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नव्हती. नवीन सदस्यांची नावे नसल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन तसेच ३० एप्रिलच्या अगोदर बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
आठवडाभरात होणार निवडणूक कार्यक्रम जाहीर
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यास जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांसाठी मतदारांची अंतिम मतदारयादी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झालेल्या येत्या आठवडभरात बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होवू शकतो अशी शक्यता राजकारण्यांकडून वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रामध्ये कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम यादी सोमवारी (दि. २० मार्च) जाहीर झाली. १८ जागांच्या निवडणुकीसाठी ३ हजार १३३ मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
सोमवारी दि २० मार्च रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार सहकार विभागाच्या वतीने अंतिम यादी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे ज्या शेतकर्याच्या नावाने सातबारा असेल त्या शेतकर्याला या बाजार समितीचे निवडणुकीमध्ये निवडणूक लढवता येणार असून त्याला या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मात्र राहणार नाही. त्यामुळे शासनाने शेतकर्यांसाठी हा पहिल्यांदाच निर्णय घेतला असल्याने अनेक इच्छुक जरी ग्रामपंचायत सदस्य अथवा सेवा संस्थेचे संचालक नसले तरी सर्वसामान्य शेतकरी सातबारा उताराच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरू शकतात.
त्यामुळे या बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या सर्व पक्षीय उमेदवारांच्या अंतिम यादीकडे नजर असून यादी जाहीर होताच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी लवकर निवडणूक जाहीर होण्याची शयता पण व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी अगोदर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सर्वपक्षीय या निवडणुकीत उतरणार आहेत.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जवळपास जाहीर झाली असून या निवडणुकीत १८ जागांसाठी ३ हजार १३३ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांसाठी १ हजार १३३ तर ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागांसाठी १ हजार ५२ व्यापारी मतदारसंघातील २ जागांसाठी ७६ तर हमाल मापाडी व तोलाई मतदारसंघातील १ जागा साठी १६२ मतदारांना मतदान करणार आहेत तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकर्यांना निवडणूकीसाठी उभे राहता येत असल्याने अनेक जण आपले नशीब पण या निवडणुकीत आजमावू शकतात असे सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.
COMMENTS