मुंबई । नगर सह्याद्री - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-वाशी-परंडा मतदार संघ...
मुंबई । नगर सह्याद्री -
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-वाशी-परंडा मतदार संघाचे तत्कालीन आमदार आणि ठाकरे गटाचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांना चार अपत्य असताना, त्यांनी दोन अपत्यांचीच माहिती निवडणुकीत दिली होती.
त्यावर पालकमंत्री तानाजी सावंत यांची पुतणे धनंजय सावंत यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणात गुरूवारी लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा धक्का मानला जातो आहे.
ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह हा सिंधू यांच्यासोबत झाला होता मात्र त्यांचे निधन झाले आहे. सिंधू यांच्यापासून पाटील यांना दोन अपत्ये होती. त्यानंतर पाटील यांनी राणी उर्फ उषा यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्यापासून त्यांना दोन अपत्ये झाली आहे. त्यातील पहिले अपत्य हे 15 सप्टेंबर 2006 व दुसरे 15 ऑक्टोबर 2008 रोजी झाले होते.
या चारही अपत्य यांच्या नोंदी नगर परिषद बार्शी येथे करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर पाटील हे यापूर्वी 2009 मध्ये जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांना 2001 नंतरचे 2 अपत्य असल्याने संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती.
त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी अपत्यांची माहिती लपवली होती.
COMMENTS