अहमदनगर । नगर सह्याद्री विविध कामांसाठी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना मुंबईला यावे लागते. त्यांना हक्काची निवासव्यवस्था उपलब्ध करून देण...
अहमदनगर । नगर सह्याद्री
विविध कामांसाठी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना मुंबईला यावे लागते. त्यांना हक्काची निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एक भव्य शिक्षकभवन असणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईत भूखंड उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाअधिवेशनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली. विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात भूखंड उपलब्ध झाल्याबरोबर शिक्षकभवन बांधण्याची जबाबदारी सरकार घेईल अशी घोषणा केली अशी माहिती राज्यसंघाचे नेते डॉ. संजय कळमकर व राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी दिली.
आबासाहेब जगताप म्हणाले, राज्यसंघाचे नेते संभाजी थोरात यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे राज्यपातळीवरील प्रश्न मांडले. त्याचा सविस्तर उहापोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या सक्तीची अट तात्काळ रद्द करण्याची घोषणा केली. तसेच जुनी पेन्शन देण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा करून सर्व सरकारी शाळेतील मुलांना यापुढे सरसकट गणवेश दिले जातील असे आश्वासन दिले. संगणक परीक्षेमुळे अनेक शिक्षकांच्या वेतनातून होणारी कपात थांबवा असे आदेशही त्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिले. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शिक्षकांना हवे तिथे बदली दिल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील अशा धोरणाचा विचार सुरु असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेकडे पगाराची रक्कम न पाठवता ती सरळ शिक्षकांच्या खात्यावर जमा केल्यास प्रत्येक महिन्याचे पगार वेळेवर होतील असे सांगून त्यांनी अशी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सुतोवाच केले. अधिवेशनात डॉ.संजय कळमकर, राज्यसरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्याध्यक्ष अंबादास वाजे, यांचीही भाषणे झाली. अधिवेशनात एक लाखाच्यावर शिक्षक समुदाय उपस्थित होता.
नगरकरांनी गाजविले अधिवेशन
रत्नागिरी येथील असे अधिवेशन खर्या अर्थाने नगरकरांनी गाजवाल्याचे रावसाहेब सुंबे यांनी सांगितले. डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित शिक्षकांना मंत्रमुग्ध केले तर आबासाहेब जगताप यांनी प्रास्ताविकातून अभ्यासूपणे प्रश्नांची मांडणी केली. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून संजय कळमकर यांच्या ‘झुंड’ या कादंबरीतील काही दाखले देऊन उपस्थितांना आपल्या साहित्यप्रेमाची चुणूक दाखवली.
COMMENTS