सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची भावनिक टिपणी नवी दिल्ली । नगर सह्याद्री सुप्रीम कोर्टात सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा खटला ...
सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची भावनिक टिपणी
नवी दिल्ली । नगर सह्याद्री
सुप्रीम कोर्टात सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा खटला देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी एक भावनिक वक्तव्य केलं. या खटल्यात मी हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. मात्र इथे उभा आहे तो राज्य घटनेच्या संरक्षणासाठी, असं कपिल सिब्बल म्हणाले. सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे खटल्यावर युक्तिवाद सुरु आहेत. कोर्टाने सर्वात आधी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करायला सांगितले.
सिब्बल यांनी सलग तीन दिवस युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाचेच वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. गुरुवारी युक्तिवादात सिब्बल यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार तसेच बहुमत चाचणीतील आकडेवारीवरून जोरदार युक्तिवाद केला.
आयोगाने पक्षपातीपणा केला
युक्तिवाद संपवण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवलं. आयोगाने शिवसेना पक्षासंबंधी निर्णय घेताना जी कागदपत्र ग्राह्य धरली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शिंदे गटाच्या वतीने 19 जुलै रोजी याचिका दाखल केली. मात्र त्यात 27 जुलैच्या बैठकांचे मुद्दे पुराव्यादाखल देण्यात आले आहेत. हे दोन्ही डॉक्युमेंट आयोगाकडे आहेत. 19 तारखेलाच त्यांना 27 तारखेच्या मीटिंगमध्ये काय होतंय, हे कसं माहिती असेल, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. त्यामुळेच निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला, हे सिद्ध होतं आणि अंतिम निर्णय त्यांच्या बाजूने घेतला गेला, असा दावा सिब्बल यांनी केला.
COMMENTS