औरंगाबाद / नगर सहयाद्री- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यात एकदाच मंत्र...
औरंगाबाद / नगर सहयाद्री-
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यात एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालाच नाही. त्यामुळे अनेकांनी मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंगही सुरू केली.संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे.
राज्यात आता मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागणार आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर 20 ते 22 तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असा अंदाज संजय शिरसाट यांनी वर्तवला आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेवरही टीका केली. येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार आहे. शिवसेनेचे उरलेले आमदार 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.शिवसेनेत जो सकाळचा भोंगा सुरू आहे त्यामुळे शिवसेना रिकामी होणार आहे. भविष्यात निवडणुका लढवयाच्या की नाही असा प्रश्न उध्दव ठाकरे समोर उभा राहील, असं भाकीतही त्यांनी केलं आहे.
आमचा उठाव झाला. तेव्हा मी प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोकं आहेत त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे? काय बोलत आहेत? त्यांना पक्षाशी काही घेणंदेणं नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. अंबादास दानवे हे संजय राऊतांचे शिष्य आहेत. त्यामुळे ते त्या भूमिकेत बोलतात. राऊत आणि त्यांचं बोलणं मॅच होण्यासाठी ते बोलत असतात, असा चिमटा त्यांनी काढला.
COMMENTS