उद्धवजी राजकीय विरोधक, वैयक्तिक नाही मुंबई | वृत्तसंस्था महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उप...
उद्धवजी राजकीय विरोधक, वैयक्तिक नाही
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला मातोश्रीचे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला परवा एका कार्यक्रमात भेटल्या तेव्हा मी म्हटले की उद्धवजींना नमस्कार सांगा, कारण मी त्या वृत्तीचा नाही असेही फडणवीस म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हे सांगितले. उद्धव ठाकरे आणि तुमच्यात खूपच कटुता आल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, माझ्याकडून कुठलेही वैर नव्हते; पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरे यांनीच बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो, तरीही ते असे वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचे, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिले होते. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आले होते. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडले नाही. माझ्याकडून कुठलीही कटुता आजही नाही. राजकीय दृष्ट्या मी उद्धव ठाकरे यांचा विरोधक आहे; पण व्यक्तिगत पातळीवर काहीही वैर नाही. फडणवीस म्हणाले, परवा एका कार्यक्रमात रश्मीवहिनी भेटल्या. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या बहिणीशीही बोललो. मी त्यांना हे देखील सांगितलं की उद्धवजींना माझा नमस्कार सांगा. राजकीय दृष्ट्या मी उद्धवजींचा विरोधक आहे; पण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही. मी त्या संस्कारांनीच वागतो.
COMMENTS