प्रतिस्पर्धी कोण याचा विचार करीत नाही पारनेर । नगर सह्याद्री - विकास कामे करणे हे माझे काम आहे. माझ्यात संपर्काचा अभाव आहे, ही माझी निगेट...
प्रतिस्पर्धी कोण याचा विचार करीत नाही
पारनेर । नगर सह्याद्री -
विकास कामे करणे हे माझे काम आहे. माझ्यात संपर्काचा अभाव आहे, ही माझी निगेटिव्ह बाजू आहे. त्यात मी सुधारणा करू शकत नाही. माझ्या कुटूंबाने 50 वर्षे जे जपले ते पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील माझा प्रतिस्पर्धी कोण, उमेदवारीसाठी कोण प्रयत्न करतेय, याचा मी कधीही विचार करीत नाही. खासदारकीवर आमाचा प्रपंच नाही. मी अनसेक्युअर्ड नाही. कोणी माझे भवितव्य ठरवू शकत नाही. पुढील खासदार गोरगरीब जनता ते ठरवेल, असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
खा. डॉ. विखे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सुपा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी खा. विखे बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, राज्य कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, राहुल शिंदे, सचिन वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्यासह भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. खा. विखे म्हणाले, दोन वर्षात कोरोनाचे संकट तसेच राज्यात सत्ता नसल्याने केवळ केंद्राच्या योजना मतदारसंघात राबविल्या. त्यास पत्रकारांनी प्रसिद्धी दिली. पत्रकारांनी दिलेली प्रसिध्दी लोकप्रतिनिधीला आवडते. टीकात्मक बातमीमुळे राग धरणार्या राजकारण्यांसारखा मी नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा जनतेचा पत्रकारांवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या देऊन समाजाला दिशा देण्याचे काम करावे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात भाजपाचे सरकार आल्यामुळे तसेच जिल्ह्याच्या नेतृत्वाला मंत्रीमंडळात संधी मिळाल्याने आचार संहिता संपल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढणार. गावोगावचा विकास तसेच जनसंपर्क ठेवणे हे लोकप्रतिनिधीसाठी महत्वाचे असते. काही लोकप्रतिनिधी निधी आणतात मात्र त्याचा पाठपुरावा केला जात नाही. काही लोकप्रतिनिधी फोनवर उपलब्ध असतात, सार्वजनिक जीवनामध्ये काय काम आहे याचा विचार केला जात नाही. मी मात्र विकास कामांवर भर देणारा माणूस आहे. पाच वर्षापूर्वी संकटाच्या काळात मी लोकसभेची निवडणूक लढविली. कोरी पाटी असल्याने तसेच विकास कामे केलेली नसल्याचे काय होणार हे मलाही माहीती नव्हते. आजोबांची पुण्याई तसेच मोदींचा चेहरा यामुळे माझा सहज विजय झाला. यावेळी मात्र प्रचंड विकास कामे झालेली असल्याने आपण निश्चिंत आहोत.
सुजित पाटलांना चिमटे !
भाषणादरम्यान खा. विखे यांनी सुजित झावरे पाटील यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. माझ्या विरोधात सुजित पाटील उभे राहिले तर याचा विचार मी का करावा, असा सवाल त्यांनी केला. तुमच्या गाडीत तुम्ही कोणाला घेऊन फिरता? तुमच्या गाडीतील सहापैकी केवळ एकच तुमच्याजवळ ठेवण्याची ताकद माझी असल्याचे सांगत विखे यांनी अनेकांना सूचक इशारे दिले.
कितीही प्रवेश करू शकतो
काहींना वाटते विखेंकडे महसूलमंत्री, पालकमंत्रीपद आहे. आपला व्यवसाय चांगला चालवायचा असेल तर खासदारांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे. ते माझ्याशी संपर्क करतात. मात्र असे प्रवेश आपण करून घेत नाही. प्रशासनाच्या दबावाने कोणालाही जवळ घेता येत नाही, माणूसकीच्या नात्याने माणूस जवळ आला पाहिजे. गेल्या दहा वर्षात एकाही व्यक्तीने आपला विश्वासघात केला नाही, असे डॉ. विखे यांनी सांगितले.
समाजासाठी वाईटपणा घेऊ
राधाकृष्ण विखे महसूल मंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तीन महिने या विभागाने प्रामाणिक काम केले आणि जिल्ह्यात खडी, मुरूम, वाळू मिळणे दुरापास्त झाले. आजवर हे सर्वजण बेकायदेशीर काम करीत होते. नियमात कोणीही नव्हते. त्यानंतर मोठा उद्रेक झाला. आक्रोष मोर्चा निघाला. मात्र स्वतःवर वाईटपणा ओढावून घेण्याला हिंमत लागते. समाजासाठी तो वाईटपणा घेण्यास आम्ही तयार आहोत, असे खा. विखे म्हणाले.
ती क्षमता विखे परिवाराकडे
पारनेर-श्रीगोंदे उपविभागासाठी पाच कोटींचे प्रांत कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी एकाच इमातीमध्ये सर्व शासकिय कार्यालये, गौण खनिजाबाबत नियमानुसार कार्यपद्धती, प्रलंबित मोजण्यांवर उपाय म्हणून राज्यातील पायलट प्रोजेक्ट नगर जिल्हयात राबविण्यासाठी साडेसहा कोटींची तरतूद आदी लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वीही नगर जिल्हयाकडे महसूलमंत्रीपद होते; मात्र बदल काही दिसून आला नाही. ती क्षमता विखे परिवाराकडे आहे, असे सांगत खा. विखे यांनी सल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.
मयत, दशक्रिया विधीसाठी नव्हे !
जनतेने मला विकास कामांसाठी निवडून दिले आहे. गाडी घेऊन मयत, दशक्रिया विधी करण्यासाठी नाही. त्याचे परीणाम मला भोगावे लागले तरी चालेल. काही लोक मानसिक रोगी आहेत. त्यांना मी मानत नाही. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी कसा होईल, हे पाहिले पाहिजे, असे डॉ. विखे म्हणाले.
COMMENTS