मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याच...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उठले आहे. त्यामुळे काही आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी त्यांच्यावर काल, शनिवारी पुण्यात शाईफेक केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेकीच्या घटनेमागे शरद पवारांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता.
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते. यावेळी ते त्यांनी पवार कुटुंबियांना आवाहन दिले आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी मला वारंवार टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपते. पवार घराणे, ठाकरे घराणं मला टार्गेट करते. संजय राऊत, आदित्य ठाकरे, नव्याने आलेल्या सुषमा अंधारे मला टार्गेट करतात. यांना महाराष्ट्रात घराणेशाही आणायची आहे.
रोहित पवार यांनी गेले २ ते ३ दिवस वातावरण बिघडवले असा आरोप करत रोहित पवारांनी आंबेडकर वाचले आहेत का? रोहित पवार माझ्या समोर येऊन बसा असे ते म्हणाले आहे. तसेच मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढणार असं थेट आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्याला दिले आहे.
यावेळी त्यांनी एका पत्रकारावरही आरोप केला आहे. बरोबर शाही फेकतानाच कसा पत्रकाराला अॅंगल मिळाला? त्या पत्रकारावर कारवाई झाली नाही तर मी आंदोलनाला बसेल. हा काही पत्रकारितेला शोभणार विषय नाही. ही वृत्ती मोडून काढावी लागेल. मी अपील केलंय की कुणी काही करायचे नाही. उद्या पंतप्रधान मोदी राज्यात आहे म्हणून हे सगळे चाललंय असे पाटील म्हणाले आहे.
भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
COMMENTS