महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या अधिवेशनात विशेष ठराव मांडणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या सीमावादावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विशेष ठराव मांडणार आहेत. ते बहुमताने मंजूर होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नावर प्रतिउत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, 'काल जे बोलत होते त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काहीच का केले नाही याचे मला आश्चर्य वाटते. आमचे सरकार आल्यानंतर सीमावाद निर्माण झाला नाही. हा वाद महाराष्ट्राची निर्मिती आणि भाषिक आधारावर राज्यांच्या निर्मितीच्या वेळी सुरू झाला. वर्षानुवर्षे हा वाद सुरू आहे. आम्ही या प्रकरणात कधीही राजकारण करत नाही आणि कोणीही यावर राजकारण करणार नाही अशी आशा आहे. सीमाभागात राहणाऱ्या लोकांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांना वाटले पाहिजे.'
सोमवारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सीमा वादावर शिंदे यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद मिटत नाही तोपर्यंत कर्नाटकातील वादग्रस्त भागाला 'कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र' असे संबोधत करून केंद्र सरकारने हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा आणि महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या प्रस्तावात या मागणीचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, सीमावादावर आणल्या जाणाऱ्या ठरावाचा विचार करायला हवा. आम्ही आमचे मत ठेवू. आम्ही सीमावर्ती महाराष्ट्रीयन लोकांसोबत आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना केंद्र सरकार वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करू शकते का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर अनोखे आंदोलन केले. पारंपारिक मराठी लोकगीते गाताना त्यांनी राज्य सरकारची धोरणे, कथित हेराफेरी आणि शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख केला.
COMMENTS