मुंबई । वृत्तसंस्था - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि राज्यपाल पदावरुन पायउत...
मुंबई । वृत्तसंस्था -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि राज्यपाल पदावरुन पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. ‘महापुरुषांबाबत अपमानाची मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले’ असे पत्रात म्हटले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधी, पंडित नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होते. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.
आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत.
राज्यपाल कोश्यारी म्हणतात, कोरोना काळात जेथे अनेक ’महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्या ठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारखा महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही.
मुघल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही, असे पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहले आहे.
COMMENTS