असा ठराव वर्षभर आणता येत नसल्याचे अजित पवारांचे मत नागपूर / नगर सह्याद्री - हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून या पार्श्वभूमीवर नागपु...
असा ठराव वर्षभर आणता येत नसल्याचे अजित पवारांचे मत
नागपूर / नगर सह्याद्री -
हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून या पार्श्वभूमीवर नागपुरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या ठरावाबद्दल आपल्याला काही माहितीच नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नेमके चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. काँग्रेस आमदार सुनील केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँघ्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचे सांगितले जात आहे. या पत्रावर 39 आमदारांची सही असल्याचेही बोलले जात आहे. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, आज सकाळी माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे अजित पवार म्हणाले. मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. अजित पवारांचे वक्तव्य मी पाहिले. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाही. विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचेच प्रतीक आहे, असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. तसेच, अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट असतो. ते सरळ बोलतात. बेधडक बोलतात. ते कुणाकडूनच नसतात. जे खरं आहे त्या बाजूने ते असतात, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
COMMENTS