मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, कोश्यारी यांनी २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले आहे. राज्यपालांच्या या कृतीने आणखी एका वादाला निमंत्रण मिळाले आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात आज १४ वर्ष पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना अभिवादन केले आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चप्पल काढून शहिदांना अभिवादन केले आहे.
तर दुसरीकडे राज्यपालांनी थेट चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या कृतीची भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी सारवासारव केली आहे. 'आम्ही शहिदांना अभिवादन करत असताना पोलिसांनी आम्हाला सांगितले होते. चप्पल घालून किंवा काढून अभिवादन करू शकता, त्यामुळेच राज्यपालांची चप्पल काढली नाही, असे लोढा यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. या वक्तव्यामुळे विरोधकांनी राज्यपालांसह भाजपला धारेवर धरले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील भाजप नेत्यांना देखील टीकेला समोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल बदलण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. जर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या विधानांबाबत वरिष्ठांसोबत चर्चा केली आहे. तर राज्याला नवे राज्यपाल मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
COMMENTS