अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक कामांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आणि आता ही कामे सुरुही झाली. मात्र, असे...
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक कामांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आणि आता ही कामे सुरुही झाली. मात्र, असे असताना फक्त श्रेय मिळावे या उद्देशाने विधान परिषदेतील भाजपा आमदार राम शिंदे हे ही कामे रोखून धरण्यासाठी सरकार दरबारी चकरा मारत असून त्यांच्याकडून चालू असलेल्या या घाणेरड्या आणि गलिच्छ राजकारणाला कर्जत- जामखेडची जनता उत्तर देईल, ही जनता शांत बसणार नाही असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यावर रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पाठपुरावा करून जलसंधारणाची विविध कामे काळात मंजूर करून आणली. परंतु सध्याच्या सरकारने सर्वच कामांना स्थगिती दिली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार २५ ऑक्टोबर रोजी कामावरील स्थगिती उठवणे अपेक्षित असताना विशेषतः नगर दक्षिणमधील फक्त कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके फक्त त्यातून वगळण्यात आले आहेत.
त्यामुळे येथील कामे ठप्पच आहेत. या कामांमध्ये दोन्ही तालुक्यातील मिळून २९ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलाव यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तालुक्यात मिळून जवळपास १११० टीसीएम अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होणार असून आणि तब्बल ३९२ हेक्टर नव्याने सिंचित क्षेत्र तयार होणार आहे. त्याचा फायदा हा आसपासच्या २५ गावांतील हजारो शेतकर्यांना होणार आहे. स्थगिती दिली नसती तर आतापर्यंत यातील बरीच कामे पूर्ण झाली असती.
कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारणाची मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे निविदा प्रक्रिया झालेल्या असतानाही थांबविण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कामांची स्थगिती उठविण्यात आली असली तरी या कामाचे श्रेय घेता यावे यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे ही कामे रोखून धरण्यासाठी सरकार दरबारी चकरा मारत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. जामखेडमध्ये काम सुरू झालेला राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यानंतर आता जलसंधारण कामाच्या बाबीतीतही हा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सत्ता बदलल्याचा वापर करून पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जात आहे.
नवीन सरकार आल्यावर राज्यातील अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. अनेक कामे रद्द करण्यात आली. स्थगिती देण्यात आलेल्या कामांमध्ये नगर जिल्ह्यातील आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांचाही समावेश होता. मात्र, अलीकडेच बर्याच ठिकाणची स्थगिती उठविण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यांतील कामांवरील स्थगिती उठविण्यात आली. मात्र, कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांवरील स्थगिती कायम आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आम्हाला सहकार्याची भूमिका आहे. मात्र, आमदार राम शिंदे शासन दरबारी उंबरठे झिजवत आहेत. कर्जत-जामखेडमधील सगळ्याच कामांना स्थगिती द्या, मला त्याचं श्रेय घ्यायचं आहे, असे म्हणत आहेत. त्यामुळे विकासाला बाधा निर्माण होत आहे. असे गलिच्छ राजकारण थांबवण्याची गरज आहे अन्यथा कर्जत-जामखेडची जनता शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
COMMENTS