नवी दिल्ली । नगर सह्याद्री - वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आले आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपे होते, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणे कठीण होते, असे म्हटले आहे.
मृत तरुणी वसईची असून तिचं नाव श्रद्धा वालकर आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पुनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. कुटुंबियांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पुनावाला याला अटक केली आहे. तसेच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणे कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचे ठरवले आहे. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेस्टर’मुळे आपल्याला मदत झाल्याचे त्याने सांगितले. आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले आहे.
हे निर्घृण कृत्य करणं आपल्यासाठी फार सोपे नव्हते, अशी कबुली आफताबने दिली आहे. मृतदेहाचे तुकडे करण्याआधी आपण दारु पित होतो. तसेच दुर्गंध येऊ नये यासाठी तोंडावर मास्क किंवा कपडा बांधत होतो. आपण हे नेमके काय करुन बसलो आहोत आणि कशात अडकलो आहोत, हा विचार करुन आपण सारखे रडत होतो. मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या. पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणार्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसर्या ठिकाणी फेकून देत होता.
श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबियांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसोच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑटोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली; पण कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितले. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या.
COMMENTS