खा. संजय राऊत ः राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री गप्प का? मुंबई । वृत्तसंस्था - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत ता...
खा. संजय राऊत ः राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री गप्प का?
मुंबई । वृत्तसंस्था -
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केल्याने राज्यातील शिंदे सरकार गेले नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहे. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे, कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे.
तरी देखील आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहेत. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवले, असा टोला राऊतांनी लगावला. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही राज्यपालांनी अद्याप माफी मागितली नाही. फडणवीस त्यांचे समर्थन करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे गप्प आहेत. असे सरकार सीमा प्रश्न काय सोडवणार?
आदित्य ठाकरे आज बिहारच्या दौर्यावर आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या मदतीने परिवर्तन केले. महाराष्ट्रातही लवकरच असे परिवर्तन होईल. आदित्य ठाकरे तेजस्वी यादवांची भेट घेणार आहेत. देशात अशा तरुण नेत्यांची मजबूत फळी उभारण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. देशातील सर्व तरुण नेत्यांना आदित्य ठाकरे यांची भेट घ्यायची आहे. याकडे एक राष्ट्रीय राजनिती म्हणून बघितले पाहिजे.
COMMENTS