लोणी । नगर सह्याद्री कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होण्याबाबत तिव्र लोकभावना असलेल्या गावांमध्ये वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहि...
लोणी । नगर सह्याद्री
कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होण्याबाबत तिव्र लोकभावना असलेल्या गावांमध्ये वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे, त्यामुळे समस्यांमुळे ग्रामस्थांच्या झालेल्या उद्रेकाला सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. या गावांना विशेष पॅकेज देवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. या राज्यात 15 वर्षे युपीएचे सरकार होते. पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतरीत होण्याची इच्छा व्यक्त करणार्या या गावांवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. मग 15 वर्षे सत्तेत राहुन तुम्ही काय मिळविले? हे पाप तुम्ही कोणाच्या माथी मारणार? असा सवाल करुन, मागील अडीच वर्षेही सत्तेत राहीलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच या गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याची टिका विखे यांनी केली.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवितांना मंत्री विखे पाटील म्हणाले, स्क्रीप्ट लिहीणे आणि दिलेल्या स्क्रीप्ट वाचन करणे, याचा मोठा अनुभव त्यांना आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना खा. संजय राऊत यांना रोज दिली जाणारी स्क्रीप्ट ‘सिल्व्हर ओक’ येथूनच येत होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात कुठेलेही तथ्य नाही. सुविधा अपुर्या असलेल्या गावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज जाहीर करुन, या ग्रामस्थांना दिलासा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. तीव्र भावना असलेल्या या गावातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही विखे यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात शेतकरी दिंडी काढण्याचा जाहीर केलेला निर्णय आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद कार्यक्रम म्हणजे केवळ राजकीय फार्स असून, अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांना शेतकर्यांची आणि जनतेची आठवणही झाली नाही.
ते आता शेतकर्यांचा कळवळा घेऊन घराबाहेर पडले आहेत. परंतु यापूर्वी मराठवाड्यात जाऊन शेतकर्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या घोषणेची आठवण मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरे यांना झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या संवाद कार्यक्रमाला कोणताही जनाधार मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री आपल्या सहकारी आमदारांना घेवून कामाख्या देवीला गेले असतील तर त्यात कोणतेही वावगे नाही. तो श्रध्देचा भाग आहे. त्यांच्या दौर्याला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु ज्या लोकांना जनतेने नाकारले त्यांच्याकडून या दौर्यावर टिका होणे सहाजीक आहे. टिका करण्यापेक्षा त्यांनीही आता आपली श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी जाऊन अभिषेक करावा, असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला.
COMMENTS