नवी मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या आठ महिन्यांपासून रोडावलेल्या कांद्याच्या दराने आता उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात म...
नवी मुंबई / नगर सह्याद्री -
गेल्या आठ महिन्यांपासून रोडावलेल्या कांद्याच्या दराने आता उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मागील आठवड्यापर्यंत ७ ते १० रुपये किलो असलेल्या कांद्याच्या दरात आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, एक किलो कांदा १५ ते २५ रुपये किलो झाला आहे. उत्तम दर्जाच्या नवीन कांद्याला २५ ते २७ रुपये किलोचा भाव मिळत आहे. परतीच्या पावसाने लांबवलेला मुक्काम, परिणामी संकटात सापडलेली नवीन लागवड... त्यामुळे कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. येत्या काळात हे दर असेच वाढत राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवत असल्याने दिवाळीत कांदा रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
घाऊक बाजारात दररोज कांद्याच्या ७० ते ८० गाड्या येत असतात. बाजारात येणारा कांदा उत्तम दर्जाचा असला तरी कांद्याला काही दिवसांपासून हवा तसा उठाव मिळत नव्हता. त्यात पावसानेही मुक्काम लांबवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीला पाणी लागण्यास आणि त्यामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. हा भिजत चाललेला कांदा जास्त वेळ साठवून ठेवता येणार नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा बाजारात पाठवावा लागणार आहे.
दुसरीकडे आता लावलेली कांद्याची नवीन रोपेही पावसाच्या पाण्यात सापडली आहेत. अनेक ठिकाणी शेतीच्या शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पुढील हंगामात कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आत्ताच कांद्याची खरेदी वाढविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, अचानक बाजारात कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढू लागले आहेत. येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.
सध्या दररोज कांद्याच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी बाजारात कांद्याच्या १५० गाड्यांची आवक झाली असतानाही दरात घसरण न होता वाढ झाली होती. यावरून येत्या काळात कांदा महागणार, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढून ऐन दिवाळीत कांदा सर्वसामान्यांना रडवणार असल्याचा अंदाज आहे.
COMMENTS