अहमदनगर | नगर सह्याद्री कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शेंडी बायपास (ता. नगर) येथे पकडला...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शेंडी बायपास (ता. नगर) येथे पकडला. दरम्यान गोवंशीय जनावरांची वाहतूूक करणार्या दोघांना गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. जनावरांची सुटका करत पिकअप पेटवून दिला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणार्या जावेद मुसा पठाण (वय २८) व अजमद मस्तान शहा (दोघे रा. ममदापूर ता. राहाता) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील एक लाख २० हजार रूपये किंमतीचा पिकअप, दोन मयत गाई, १८ मयत वासरे, तीन जीवंत जखमी गाई व पाच वासरे असा दोन लाख ४० हजार रूपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. जावेद पठाण व अजमद शहा यांनी गोवंशीय जनावरे पिकअपमध्ये भरून कत्तलीसाठी विक्री करण्यास नगर येथे घेऊन येत होते. याची माहिती गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी शेंडी बायपास येथून पिकअपचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना पिकअप शेंडी बायपास जवळ पलटी झाला. पिकअपमधील तब्बल १८ वासरे, दोन गाई मयत झाल्या तर तीन गाई जखमी झाल्या.
दरम्यान संतप्त झालेल्या गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पिकअपमधून गोवंशीय जनावरे बाहेर काढले. पठाण व शहा यांना मारहाण करत त्यांचा पिकअप पेटवून दिला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पिकअप व जनावरे ताब्यात घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला.
दरम्यान पठाण व शहा यांना मारहाण केल्याप्रकरणी पठाण याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगदेव भगत, सिद्धार्थ कराळे, भूषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू ऊर्फ संदीप भगत, ज्ञानू दाणी, अतुल कराळे, योगेश संतोष शिंदे, विकास चव्हाण व इतर चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS