एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी बंडामागचे कारणदेखील सांगितले आहे. तसंच सरकारचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाच्या हाती आहे याचे उत्तरही दिले आहे. हा बंड देशभरातील मोठी घटना आहे सांगताना सभागृहातील माझे भाषण उत्स्फूर्तपणे होते. लोकांच्या मनातील भावना आणि जे काही माझ्या मनात साचले होते ते सगळे बोलून मन मोकळे केले असंही त्यांनी सांगितले आहे.
सूरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, मी त्यांच्याशी बोललो आणि चाललो आहे असे सांगितले आहे. त्यांनी परत या म्हटलं. पण मी त्यांना परत येईन की नाही माहित नाही सांगितले. कारण मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हाच विचार केला असता, निर्णय बदलला असता तर ही वेळ आली नसती. आम्ही पाच वेळा त्यांच्याकडे भूमिका मांडली. पण त्यात यश आलं नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
हा निर्णय मी फक्त माझ्या खच्चीकरणामुळे घेतलेला नाही. जे २५-३० आमदार होते त्यांना रोज येणारा अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न यामुळे पुन्हा निवडून येण्याची चिंता सतावत होती. कारण पडलेल्या उमेदवाराला घटक पक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या लोकांचे खच्चीकरण करु लागले. आमच्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. निर्दोष असतानाही मोक्कासाऱख्या कारवाईंना सामोरे जावे लागले, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेला, शिवसैनिकांना काय मिळालं? शिवसैनिकाला या सत्तेचा काय फायदा झाला? त्यांची फरफट सुरुच होती. आम्ही आमच्या प्रमुखांना यात बदल झाला पाहिजे असे सांगितल होते. शेवटी जी आघाडी केली आहे ही फायदेशीर नाही. मुख्यमंत्री आमचा असताना नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. असंच सुरु राहिले तर या ३०-४० आमदारांचे भवितव्य १०० टक्के धोक्यात आले असते. यामुळेच आमदारांना मला निर्णय घ्या अन्यथा आम्ही वेडावेकडा निर्णय घेऊ सांगितले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हा एका दिवसात झालेला प्रकार नाही. आमदारांचा त्रास रोज वाढत होता. आम्ही हे सांगण्याचा प्रयत्नही केला. पुन्हा भाजपासोबत युती करु शकतो का यासंबंधी विचारणाही केली. पण त्यात आम्हाला यश आले नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. नाईलाज म्हणून हा निर्णय घेतला, पण आम्ही भाजपाशी युती करुन चुकीचा निर्णय घेतला नसल्याचंही ते म्हणाले आहे.
आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. ठाण्यात पाऊस कोसळत असतानाही हजारोंच्या संख्येने लोक वाट पाहत उभे होते. चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे शिवसैनिक आमच्यासोबत उभे राहिले नसते असं एकनाथ शिदेंनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहे. पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही.
सरकारचा रिमोट तुमच्या हातात असणार की फडणवीसांच्या असं विचारलं असता त्यांनी सांगितले की, आम्ही दोघे चांगले मित्र असून एकमेकाला विश्वासात घेऊन काम करु. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काही नसून राज्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा आहे.
COMMENTS